काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे यांनी बंडखोरी करत मुलगा सत्यजित तांबेला नाशिक पदवीधर निवडणुकीत उभं केलय. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला. यावर काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त करत आम्ही सत्यजित तांबे यांना मदत करणार नसल्याचे सांगितले.
तांबेंच्या बंडखोरीवर अद्याप बाळासाहेब थोरात मौन बाळगून आहेत. यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. काहीही गडबड होऊ शकते असे,अजित पवार यांनी सांगितले होते. यावर थोरात गप्प का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
विचारपूर्वक बोलणारे बाळासाहेब थोरात सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कारणही तसेच आहे. काँग्रेसचे नेते असलेले सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या तांबेंना बंडखोरी का करावी लागली? मामांनी भाचाला जाणीवपूर्वक बाजूला केलं होतं का? म्हणून तर भाचा सत्यजित तांबे यांनी मामाचा हात सोडला का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कौटुंबिक कारण…
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मतदार संघात त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात या एकविरा फाउंडेश आणि इतर संस्थेच्या माध्यमातून सध्या राजकीय धडे गिरवत आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे अस्वस्थ आहेत का? विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार जर बाळासाहेब थोरात यांना कल्पना दिली होती हे खरे असेल तर, या बंडाला थोरात यांचा छुपा पाठींबा आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो.