प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. चार महिन्यांच्या अंतराने 2-2 हजार रुपये करून, ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आतापर्यंत 12 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले. आता शेतकरी 13व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता लवकरच जारी केला जाईल. केंद्र सरकार नवीन वर्षाची भेट म्हणून 13वा हप्ता जारी करून शेतकऱ्यांच्या वर्षाची सुरुवात गोड करू शकते. मात्र, अजूनही घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे.
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. गत वर्षी सप्टेंबरमध्ये 10 लाख शेतकऱ्यांना 12वा हप्ता म्हणून सुमारे 8 कोटी रुपये जारी करण्यात आले. तर आता शेतकरी 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबर-मार्च कालावधीत 13 वा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात जारी केला जाऊ शकतो. अजूनतरी अधांतरी आहे.
मात्र, 13व्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने खाते सत्यापित करण्यासाठी 31 डिसेंबरपूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, असे सरकारने शेतकऱ्यांना सांगितले आहे. प्रक्रिया पूर्ण न केल्यास हप्त्याचे पैसे बंद होऊ शकतात. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे, त्यांनी त्यांच्या स्थितीची तपासणी केली पाहिजे.
eKYC अपडेट करण्याचे दोन मार्ग
पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी eKYC पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन आणि बायोमेट्रिक पद्धती वापरू शकतात. पीएम किसान योजनेच्या वेबसाइटनुसार पात्र शेतकरी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) द्वारे स्वतः eKYC पूर्ण करू शकतात. तर, बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसीसाठी लाभार्थीला जवळच्या CSC केंद्रावर (कॉमन सर्व्हिस सेंटर) जावे लागेल.
नागपूर जिल्ह्यात वंचित…
नागपूर जिल्ह्यात आधार लिंक नसल्याने 43 हजार 856 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाही. परिणामी, या योजनेपासून शेतकरी वंचित राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.