छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल प्रकरणात ईडीने यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोटीस देवून चौकशी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनाही ईडीची नोटीस आल्याची चर्चा होती. मात्र, अशा प्रकारची कुठलीही नोटीस आली नसल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
पांडेय काय म्हणाले?
नवीन मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या भेटीसाठी मुंबईत आलो आहे. त्यामुळे अद्याप अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचे त्यांनी सागितले. घरकुल घोटाळा प्रकरणामुळे महापालिका स्तरावर मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. तसेच केंद्रीय पातळीवर देखील या प्रकरणात जागेपासून कुठलेच काम न झाल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी नाराजी वर्तवली आहे.
देशात इतर ठिकाणी घरकुल बाबतची कामे वेगाने होत असताना छत्रपती संभाजी नगर मात्र याबाबतीत पिछाडीवर पडले आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे.
प्रकरण काय?
महापालिकेने पंतप्रधान आवास (घरकुल) योजनेंतर्गत सुमारे 39 हजार घरांचा ‘डीपीआर’ तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली. फेब्रुवारी 2022 मध्ये टेंडर निघाल्यानंतर समरथ मल्टिबीज इंडिया प्रा. लि., इंडग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व जग्वार ग्लाेबल सर्व्हिसेस या कंपन्यांनी एकाच ‘आयपी अॅड्रेस’वरून टेंडर भरले. यातून कोट्यवधींचा घोटाळा करण्याच्या ते तयारीत होते. या प्रक्रियेत कागदपत्रे सादर करताना पुण्याच्या न्याती कंपनीचे नाव जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीशी जोडण्यात आले. त्यामुळे मूळ न्याती कंपनीचे संचालक नितीन द्वारकादास न्याती, पीयूष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती यांना अनुक्रमे 16, 17 आणि 18 क्रमांकाचे आरोपी करण्यात आले.
विश्वभारत News Website