कर्नाटक उच्च न्यायालयाने फेसबुकला चांगलीच तंबी दिली आहे. बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला इशारा दिला आहे. जर फेसबुक राज्य पोलिसांना सहकार्य करू शकत नसेल, तर फेसबुकची संपूर्ण भारतातील सेवा बंद करण्याचा विचार करू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
सौदी अरेबियामध्ये तुरुंगात असलेल्या भारतीयाशी संबंधित प्रकरणाच्या तपासासंदर्भात न्यायालयाची ही टिप्पणी केली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी फेसबुक कर्नाटक पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बिकर्नाकाटे येथील रहिवासी कविता यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठाने सोशल मीडिया कंपनीला हा इशारा दिला. खंडपीठाने फेसबुकला एका आठवड्यात आवश्यक माहितीसह संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले.
केंद्र सरकारकडूनही मागितले उत्तर
सौदी अरेबियात भारतीय नागरिकाच्या खोट्या अटकेच्या मुद्द्यावर आतापर्यंत काय पावले उचलली गेली, हे केंद्र सरकारने सांगावे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. यासह मंगळुरू पोलिसांना तपास सुरू ठेवण्याचे आणि अहवाल दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.