एकीकडे महाराष्ट्रात तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता अजूनही उर्वरित महाराष्ट्रात म्हणावा तेवढा चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा टेन्शनमध्ये आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतात पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पवासामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर भारतात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पावसामुळे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 19 लोकांनी जीव गमावला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, उत्तर भारतात पावसाचा जोर किमान पुढचे दोन ते तीन दिवस राहणार आहे. त्यामुळे दिल्ली, गुरुग्राम, नोएडा येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर अमरनाथ यात्राही थांबवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांनी रौद्र रुप धारण केलं आहे. आधीच धो धो पाऊस आणि नद्यांनी घेतलेलं रौद्र रुप यामुळे गावांमध्ये कमरेएवढं पाणी शिरलं. अनेक घरांमध्ये पाणी गेलं आहे. पुरस्थिती निर्माण झाली असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली आणि जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.
भारतीय हवामान विभागने सांगितले की, 1982 पासून, दिल्ली NCR मध्ये जुलैमध्ये एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीत पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस येथे पाऊस पडेल, परंतु त्याची तीव्रता कमी असेल. पुढील २४ तासांत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.