Breaking News

नागपूर शहरातील खड्ड्यामुळे गेले 18 जणांचे जीव : पीडब्लूडी आणि महापालिकेचे दुर्लक्ष

केंद्रात वजनदार असलेले केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असलेले नागपूर रुंद सिमेंट रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्यासोबतच येथील डांबरी रस्त्यांची खड्डय़ांमुळे झालेली चाळणही या शहराची नवी व वेगळी ओळख ठरली आहे. पावसाळय़ात या रस्त्यांवरून वाहने चालवताना सर्वसामान्यांना करावी लागणारी कसरत जीवघेणी आहे. मागील सहा महिन्यांत शहरात १८ मृत्यू खड्डय़ांमुळे झालेल्या अपघाताने झाले असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.

शहरात एकूण ३,५४९ किमी लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी २,४०६ किमी रस्ते महापालिकेच्या अखत्यारीतील आहेत. उर्वरित इतर विकास प्राधिकरणांचे आहेत. एकूण रस्त्यांपैकी बहुतांश प्रमुख रस्ते मागील एक दशकात सिमेंटचे झाले. पण अंतर्गत आणि सीमावर्ती भागातील रस्ते डांबरीच आहेत. पावसाळय़ात त्यावरील खड्डय़ांची समस्या मोठे रूप धारण करते. दरवर्षी पावसाळापूर्व नियोजनाचा भाग म्हणून रस्ते दुरुस्तीची कामे केली जातात. यंदा महापालिकेने १२ मीटरहून अधिक रुंद १०७ रस्त्यांची दुरुस्ती केली. १ एप्रिल ते ३० जून २०२३ या दरम्यान ९९१ खड्डे बुजवले, असा दावा महापालिकेने केला. सर्वाधिक खड्डे उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या लक्ष्मीनगर झोनमध्ये आढळून आली. मात्र हे सर्व रस्ते व त्यावरील खड्डे पहिल्याच पावसात वाहून गेले. त्यात भर पडली ती अर्धवट सिमेंट रस्त्यांची. रविनगर चौकात मागच्याच आठवडय़ात खड्डय़ामुळे एका तरुण मुलीचा अपघाती मृत्यू झाला. त्यापूर्वी मुलीला शिकवणी वर्गात सोडून घरी परतणाऱ्या महिलेला सहकारनगरात ट्रकने धडक दिली. यासाठीही खड्डाच कारणीभूत ठरला होता. शहरातील मध्यवर्ती धरमपेठ भागात १५ डांबरी रस्त्यांवर खड्डे आहेत. सीमावर्ती भागातील पारडी, पिपळा, हुडकेश्वर आणि कळमना भागातील रस्त्यांवर तर पायदळ चालणे अवघड व्हावे इतके खड्डे आहेत.

अशाही स्थितीत सकाळी सायकल, दुचाकी घेऊन मुले शाळेत, शिकवणी वर्गाला जातात, पाऊस पडला तर खड्डे दिसत नाही, त्यात वाहने अडकून मुले पडतात. त्यामुळे घराबाहेर गेलेली मुले परत येईपर्यंत पालकांचा जीव जागेवर नसतो. सी-२० साठी दोन आठवडय़ांत सव्वाशे कोटी रुपये खर्च करून शहर सजवणारी महापालिका खड्डय़ाच्या समस्येकडे केवळ औपचारिकता म्हणून बघते.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील कोराडीत वेतनवाढ मिळाल्याने वीज कामगारांचा जल्लोष

नागपुरातील कोराडीत वेतनवाढ मिळाल्याने वीज कामगारांचा जल्लोष टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोराडी। नोव्हेंबरमध्ये होणारी …

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमबाह्य बढती : मुख्य सचिवांकडे तक्रार

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत बढती देण्याचा प्रस्ताव दाखल करताना नियम डावलले असल्याची तक्रार महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *