आदिवासी आश्रम शाळेतील ३७ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली येथे घडली आहे. बटाटा, वाटाणा, भात, वरण, चपाती खाल्ल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला लागले.
त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३७ विद्यार्थ्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित ३३ जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी रुग्णालयात जावून डॉक्टरांकडून माहिती घेत विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी केली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रमशाळा आहे. ही आश्रमशाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. या आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण दिले जात असून तिथे सुमारे ३२५ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहे.
गुरूवारी नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना दुपारच्या सुमारास जेवण देण्यात आले. बटाटा, वाटाणा, भात, वरण, चपाती याच भोजन केल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला लागले. तर, काहींना चक्कर आली. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांकडे केली. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, सायंकाळनंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलटीचा अधिकच त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हळूहळू आणखी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने प्रकरण गंभीर झाले. रात्री उशिरापर्यंत ११ ते १७ या वयोगटातील ३६ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चार यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
विश्वभारत News Website