मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विकास व्हावा, यासाठी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सात वर्षांनी का होईना, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने मराठवाड्याच्या दृष्ट्रीने काही मत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतले. विरोधकांनी मात्र, हे सर्व जुनेच निर्णय असल्याचा आरोप केला आहे. या सर्वात आता एक नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नांदेड आणि लातूर जिल्ह्याला ठेंगा दाखवत सर्व विकास आपल्या परळी मतदार संघात खेचला आहे. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांमध्ये नाराजी आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला हलवले आहे. वास्तविक यातील एक केंद्र हे लातूरमध्ये तर दुसरे केंद्र नांदेडमध्ये होणे अपेक्षीत होते. मात्र, धनंजय मुंडे यांच्या सोबत अजित पवारांचे वजन असल्याने त्यांनी हे दोन्ही केंद्र आपल्या मतदार संघात हलवले. त्यामुळे लातूर आणि नांदेडचे लोक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.
या आधी अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री असतांना त्यांनी देखील केवळ स्वत:च्या मतदार संघाचा विचार केला. आता धनंजय मुंडे देखील तसेच करत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांऐवजी कृषी मंत्री मतदार संघाचा विकास करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असले तरी त्यांच्यासाठी देखील विकास म्हणजे सबकुछ परळी आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयांकडे पाहता सध्या तरी तसेच म्हणाता येईल.
विश्वभारत News Website