सरकारी कर्मचाऱ्यांनी एका सरकारी योजनेवरच डल्ला मारला आहे. शासकीय रक्कम लाटल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आला आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असल्याचं दाखवत सरकारी कर्मचाऱ्यांनी कोट्यवधींची लूट केल्याचं उघड झालंय. तब्बल 26 हजार शेतकरी, सरकारी कर्मचाऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला.
पीएम किसान योजनेचा या सरकारी कर्मचाऱ्यांनी कसा गैरफायदा घेतला पाहुया.
सरकारी कर्मचारी या योजनेसाठी अपात्र असतानाही शेतकरी असल्याचं दाखवत पैसे लाटण्यात आले. हा सगळा प्रकार उघडकीस येताच रक्कम वसूल करण्यासाठी महसूल विभागाद्वारे अमरावती जिल्ह्यातील हजारो शेतक-यांना नोटीस बजावण्यात आल्यात. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 26212 नोकरदारांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलाय. जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आलेल्या 2132 अपात्र लाभार्थ्यांनी 1 कोटी 69 लाख रुपये प्रशासनाला परत केलेत.
सरकारी योजनेतले गैरप्रकार काही नवीन नाही. मात्र हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी सरकारी योजनेचा गैरफायदा घेण्याचा हा पहिलाच प्रकार असावा.अपात्र असतानाही शेतकरी असल्याचं दाखवत हजारो सरकारी कर्मचा-यांनी सरकारी योजनेवरच डल्ला मारला. एकट्या अमरावती जिल्ह्यात 32 कोटी रुपयांचा फायदा लाटण्यात आला. हा आकडा राज्यभरात शेकडो कोटींवर जाण्याची शक्यता आहे.