चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांचा संघर्ष डोळे पाणावणारा असतो. बॉलीवूडमधील एक नाव म्हणजे सारिका हासन. दिल्लीत सारिका ठाकूर म्हणून जन्मलेल्या या अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. सारिका लहान असतानाच तिचे वडील कुटुंबाला सोडून कुठेतरी गेले. कुटुंब चालवण्यासाठी आईने लहान वयातच मुलीला अभिनयक्षेत्रात पाठवलं.
सारिकाने १९६७ मध्ये आलेल्या ‘मझली दीदी’ चित्रपटात एका चिमुरडीची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर त्यांना अनेक चित्रपट मिळाले. एकेकाळी तारुण्यात सारिकाच्या निळ्या डोळ्यांनी चाहत्यांना वेड लावलं होतं. १९७६ मध्ये आलेल्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली होती. यानंतर तिला अनेक चित्रपट मिळाले. सारिकाचे नाव ८० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनले. दरम्यान, तिची अभिनेता कमल हासनशी भेट झाली. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. कमल हासन विवाहित होते, पण त्यांच्या आयुष्यात खूप तणाव होता. आयुष्यातील अनेक चढउतारानंतर १९८८ मध्ये सारिका आणि कमल हासन यांनी लग्नगाठ बांधली होती.
कमल हासन आणि सारिका यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली झाल्या. दोघीही आज चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. पण सारिका व कमल यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि अखेर २००२ मध्ये सारिकाने कमल हासनपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात रमले. सारिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण घटस्फोटाच्या वेळी तिच्याकडे फक्त ६० रुपये होते.
एका मुलाखतीत आपली व्यथा सांगताना सारिका म्हणाली होती, “घटस्फोटानंतर माझं आयुष्य खूप कठीण झालं होतं. त्यावेळी माझ्याकडे फक्त ६० रुपये आणि एक कार होती. दुसऱ्या दिवशी काय जेवेन हे मला माहीत नव्हतं. मी काही दिवस माझ्या मित्राच्या घरी आंघोळ करायला जायचे आणि रस्त्यावर गाडीत झोपायचे. याबाबत कमल हसन यांनाही विचारण्यात आलं होतं. त्यांनी सारिकाला मदत का केली नाही, असं विचारल्यावर उत्तरात कमल हासन म्हणाले होते, “मला तिच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना नव्हती. तसेच सारिकाला सहानुभूतीचा तिरस्कार आहे, तिला कोणाचीही मदत घ्यायची नव्हती.”
विश्वभारत News Website