लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता सर्वच पक्षांकडून उमदेवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी सातवी यादी जाहीर केली. याच दरम्यान, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ‘ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत’ असे सांगत निर्मला सीतारमण यांनी लोकसभेची उमेदवारी नाकारत निवडणूक लढवण्यास नकार दिला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केली. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र आपण तो फेटाळल्याचे सीतारमण यांनी स्पष्ट केले.
१० दिवस विचार केला पण…
पक्षाच्या अध्यक्षांकडून मला लोकसभा निवडणुकीच्या उमेदावारीबाबत विचारण्यात आलं होतं. आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवा, अशी ऑफरही देण्यात आली होती. त्याबाबत मी दहा दिवस विचार केला आणि निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला , असे सीतारमण म्हणाल्या.
देशाचा निधी माझा नाही
निवडणूक लढवण्यासाठी ज्या प्रकारे पैसे खर्च केले जातात, तेवढे पुरेसे पैसे माझ्याकडे नाहीत. तुम्ही तर देशाच्या अर्थमंत्री आहात आणि तुम्हीच म्हणत आहात की माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असे विचारले असता देशाचा निधी हा माझा नाही. माझा पगार, सेव्हिंग माझी आहे, असे उत्तर सीतारामन यांनी दिले. तसेच निवडणुकीमध्ये जात किंवा धर्माचा आधार घेतला जातो, ते मला खटकतं. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी स्पष्ट नकार दिला. पक्षाध्यक्षांनीही माझ्या उत्तराशी सहमती दर्शवली असं त्या म्हणाल्या.