केपीसीएल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर काम सुरू
आयुधनिर्माण-
भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण नुकतीच सुरू झाली आहे. या खाणीतील कामगारांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली. अखेर कंपनी व स्थानिक प्रशासनाच्या मध्यस्थीने लेखी आश्वासनाअंती खाण पूर्ववत सुरू करण्यात आली.
1 डिसेंबर 2020 ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कनार्टका एम्टा कंपनीचे काम सुरू झाले. सहा महिने लोटूनही कामगारांच्या विविध समस्यांच्या पूर्तता केल्या गेली नाही. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या समक्ष 18 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत कंपनीचे व्यवस्थापन व प्रकल्पग्रस्त कामगारात आपसी करार झाला होता. त्यानंतर कामगारांनी काम करण्यास तयारी दर्शवली. पण, कंपनीद्वारे अद्यापही कराराची अंमलबजावणी झाली नाही. नियमित पगाराविषयी चर्चा केली असता, संचारबंदीमुळे बंगालचे मुख्य कार्यालय बंद असल्याचे सांगून आपले सध्या तरी वेतन होणार नाही, असे उडवाउडवीचे उत्तर दिल्या जात आहे.
संचारबंदी व कार्यालयात काही संबंध नाही. मात्र, कंपनीद्वारे कोळसा उत्खनन, ट्रान्सपोर्ट, रेल्वे नियमित पाठविणे, आभासी व्यवहार सुरू आहेत. कंपनीद्वारे कामगारांची दुरव्यहार सुरू असून, कामगारांना नियुक्तीपत्र देण्यात यावे, नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, नवीन वेतन तात्काळ देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीचा एप्रिल 2015 ते 2019 पर्यंतचा भरणा करण्यात यावा, वैद्यकीय सुरक्षेसह आदी मागण्यांना घेऊन कोळसा खाण बंद पाडण्यात आली.
शेवटी कंपनी व्यवस्थापन स्थानिक महसूल प्रशासन व कामगारांमध्ये चर्चा होऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. समस्याची पूर्तता न झाल्यास पून्हा खाण बंद पाडू, असा इशारा कामगारांनी दिला. या चर्चेदरम्यान नितीन चालखुरे, धीरज पुनवटकर, प्रमोद गणवीर, प्रमोद करवडे, गौरव रणदिवे, दिलीप नागपुरे, श्याम डोंगे यासह आदी कामगार कामगारांचा समावेश होता.