तलाठी भरती परीक्षेत थेट परीक्षा केंद्रामध्ये उत्तरे पुरवणाऱ्या एका आरोपीला संभाजीनगर येथील चिकलठाणातील इऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थी उत्तरे पुरवताना पोलिसांनी अटक केली होती. यावेळी थेट नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्याचे समजते. आता संभाजीनगर एमआयडीसी पोलिसांनी परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वयक विभागाला सोपवले आहे. आरोपपत्रानुसार नागपूरमधून प्रश्नपत्रिका भ्रमणध्वनीद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तलाठी भरतीचा पेपर फुटला हे निश्चित झाले आहे.
सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. आता खुद्द पोलीस विभागाच्या आरोपपत्रामध्ये नागपूरच्या परीक्षा केंद्रावरून प्रश्न पाठवण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तलाठी भरतीचा पेपर फुटला हे निश्चित झाले आहे. संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरून राजू भीमराव नागरे या आरोपीला परीक्षार्थींना उत्तरे पुरवताना अटक करण्यात आली होती.
सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी ही कारवाई केली. त्यांनी केलेल्या तपासामधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांच्या आरोपपत्रानुसार व्हीएमव्ही महाविद्यालय वर्धमाननगर नागपूर येथे परीक्षेत बसलेला परीक्षार्थी अंकुश जाधव सकाळी ९ ते ११ वाजता परीक्षा देत होता. यावेळी त्याने मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवून गैरप्रकार केला आहे. संभाजीनगर एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वयक तसेच अप्पर जमावबंदी आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे आता परीक्षा विभाग यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.