मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस वा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा एकनाथ शिंदे असू शकतात, अशी चर्चा आहे. तर, अडीच वर्ष फडणवीस आणि पुढील अडीच वर्ष शिंदे असा फॉर्मुला असल्याचे समजते. ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळे यांचा विचार केला जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत भरघोस बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये अधिक उत्साह संचारला आहे. विशेषतः भाजपने १३२ जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडवणीस यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जात असताना सोलापुरात या पक्षाचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी फडणवीस यांनाच मुख्यमंत्रिपद मिळण्याची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत फडवणीस यांच्या नेतृत्वामुळे भाजपसह महायुतीला २३६ जागा जिंकता आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांना दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
भाजपसह महायुती सरकारचा कारभार उत्तमप्रकारे होण्यासाठी आणि महाराष्ट्राला नवे आयाम देण्यासाठी फडवणीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. म्हणूनच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवावी. यापूर्वी त्यांनी राज्याचे नेतृत्व अतिशय यशस्वीपणे केले होते. आता पुन्हा त्यांच्याकडेच नेतृत्व यावे, अशी तमाम भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याचे आमदार देशमुख म्हणाले.