विश्व भारत ऑनलाईन :
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची हजेरी कायम असेल. मोसमी पावसाचा राज्यातील परतीचा प्रवास यंदाही नियोजित सर्वसाधारण वेळेपेक्षा उशिराने होऊ शकतो.दरम्यान, शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मुंबई, ठाणे परिसरात पावसाने जोरदार तडाखा दिला, पश्चिम महाराष्ट्रातही अनेक भागांत पाऊस झाला.
शुक्रवारी मुंबई, ठाणे परिसरात जोरदार पावसाची हजेरी होती. कोकणात रत्नागिरीसह विविध भागांत, तर मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत कोकणातील रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील गगनबावडा, नेवासा, मराठवाडय़ातील परांडा आदी भागांत १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. पुढील तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
✳️कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत ११ ऑक्टोबपर्यंत, तर मुंबईत पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
✳️उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांत पुढील ३ ते ४ दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
✳️मराठवाडय़ातील औरंगाबाद, लातूर, परभणी, बीड आदी जिल्ह्यांत, तर विदर्भात तुरळक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.