जलयुक्त शिवार अभियानाबाबत तालुकानिहाय समिती स्थापन करावी. याबाबतची कामे सात दिवसांत सुरू करावे, अशा सूचना औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्या.
समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून जलयुक्त शिवार अभियानाचा दुसऱ्या टप्प्याची कामे सुरू करा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीणा, जिल्हा जलसंधारण अधिकारी सूरज शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एस. तौर यांच्यासह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.
समितीची स्थापना
जलयुक्त शिवार अभियानात दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. शिवारफेरी, जलसाक्षरता, लोकसहभागातून अभियान यशस्वी करण्यात येईल.जिल्हा आणि प्रत्येक तालुकानिहाय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा व जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण, अशासकीय संस्थेचे पदाधिकारी जलसंधारणाचे तज्ज्ञ व्यक्ती यांचा समावेश तालुका समितीत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गावस्तर महत्वाचे
सरपंचाच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक गाव आराखडा तयार करावा. शेती, जनावरे, घरगुती वापर यासाठी पाण्याचे नियोजन समितीने समन्वयाने करावे, ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रमे राबवावा. पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्याबरोबर स्थानिक लोकसहभाग घेऊन अभियान राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या आहेत.