दहा वंदे भारत एक्सप्रेस देशातील वेगवेगळ्या शहरादरम्यान धावत आहेत.या गाड्यांची लोकप्रियताही कमालीची वाढली आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्याकडे केली आहे. नेमकी उलट स्थिती नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत आहे. मध्य भारतात या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे.
55 टक्के प्रवासी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंंदे एक्सप्रेसला 11 डिसेंबर 2022 रोजी नागपुरात हिरवा झेंडा दाखवून या गाडीची सुरुवात केली. ही गाडी सुमारे 413 किलोमीटर अंतर साडेचार तासात कापते. त्यामुळे या गाडीची लोकप्रियताही वाढेल, अशी अपेक्षा होती. पण एक-दोन दिवस वगळता गाडीला अत्यल्प प्रतिसाद आहे. या गाडीला सरासरी प्रवासी दर केवळ 55 टक्के आहे.
अत्यल्प प्रतिसाद का?
नागपूर-बिलासपूर वंदे एक्सप्रेसला अत्यल्प प्रतिसाद हा रेल्वे प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रेल्वेने अभ्यास केला. विदर्भाचे प्रमुख शहर नागपूर आणि छत्तीसगडचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर बिलासपूर दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्याच मुळी कमी आहे. नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या इतर रेल्वेगाड्या, खासगी बसगाड्यांचा अभ्यास केल्यानंतर या मार्गावर नियमित प्रवास नसल्याचे दिसून आले. औषधोपचार आणि शिक्षण घेण्यासाठी छत्तीसगड येथून नागपूरला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे प्रवासी दररोज ये-जा करीत नाही. या दोन्ही शहरादरम्यान नोकरी, व्यापार, व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्याचा परिणाम या गाडीला आवश्यक तेवढे प्रवासी मिळू शकत नसल्याचा निष्कर्ष रेल्वेच्या वाणिज्य विभागाने काढला आहे.