हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. वाढत्या अपघातांमुळे हा महामार्ग चर्चेत असताच आता समृद्धी महामार्गाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच समृद्धी महामार्गावरील ब्रिज कोसळला आहे.
समृद्धी महामार्गावर घोटी ते नाशकातील सिन्नर दरम्यान गांगडवाडी ब्रिज कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. समृद्धी महामार्गावर घोटी ते सिन्नर दरम्यान गांगडवाडी ब्रिजचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण होण्याच्या आधीच ब्रिज कोसळल्याने दर्जाबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. या ब्रिजचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातात आत्तापर्यंत 29 जणांचा बळी गेला आहे. सिन्नर ते इगतपुरी दरम्यानचा समृद्धी महामार्गाचा टप्पा सर्वाधिक अवघड टप्पा मानला जात आहे.
तर,11 डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग 701 किमी लांबीचा आहे. समृद्धी महामार्गावर सहा लेन आहेत. हा महामार्ग 390 खेड्यांमधून जाते. महाराष्ट्रातील दहा जिल्हे या मार्गात येतात. समृद्धी महामार्गामुळे प्रवास अतिशय जलद झाला आहे. मात्र, या मार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरत आहे. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर केवळ 5 तासांच पार करता येत आहे.
रिफ्लेक्टर नसणाऱ्या वाहनांना लागणार प्रतिबंध
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. यातील काही अपघात रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना येऊन गाडी धडकल्याने झाले आहेत. रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना रेडियम अथवा पेंट असलेले रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचे ग्रामीण आरटीओ ने केलेल्या कारवाईत आढळून आले अशा वाहनांवर प्रत्येकी एक हजारांचा दंड आकारात आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्वतःकडील रिफ्लेक्टर पेंट या वाहनांवर मारून पुढे सोडले. दोन दिवस ही मोहीम राबवल्या नंतर रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर समृद्धी महामार्गावरून जाण्यास प्रतिबंध लागण्यात येणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.