उन्हाळ्यात अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागली आहे. या सीझनमध्ये खाण्या-पिण्यात थोडासाही बदल झाला तरी त्याचे परिणाम लगेच आपल्या आरोग्यावर दिसून येतात. डिहायड्रेशन, उष्माघात याव्यतिरिक्त शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढू लागते. यामुळे पीएच संतुलन बिघडू शकते, तसेच बेसलाइन बायोलॉजीला त्रास होऊ शकतो. याशिवाय तुमच्या होमिओस्टॅसिस आणि पचनावर परिणाम होऊ शकतो.
आयुर्वेदानुसार, उन्हाळा हा त्वचेच्या आरोग्यासाठी एक चांगला काळ असतो. कारण घामाच्या माध्यमातून आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि त्वचा स्वच्छ होते. पण संपूर्ण शरीर शांत, थंड आणि आरामशीर ठेवण्यासाठी आहारदेखील खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करू तुम्ही शरीर थंड आणि हायड्रेट ठेवू शकता. यात उन्हाळ्याच्या महिन्यांत बहुतेक फळे आणि भाज्या उपलब्ध असतात, ज्यांत पाण्याचे प्रमाण आणि पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त असते. यावर आरोग्यतज्ज्ञ. तज्ञानुसार,उन्हाळ्यात कोणती फळे किंवा पेये आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात याची माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ…
१) बेलफळ
बेलफळ हे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. आवश्यक पोषक तत्त्वांनी समृद्ध असे हे फळ शरीरातील उष्णता कमी करते, शिवाय उष्माघातापासून बचाव करते. बेलाचे असंख्य उपचारात्मक फायदे आहेत, ते दाहविरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी आहे. तुम्ही बेलफळाचा गर खाऊ शकता किंवा ज्यूसही बनवू शकता. या दोन्ही प्रकारे सेवन केल्याने उष्माघात आणि डिहायड्रेशनची समस्या टाळू शकता.
२) सब्जाच्या बिया
सब्जाच्या बियांमुळे पोटात एक प्रकारे थंडावा निर्माण होतो. या बियांमुळे पचनसंस्था निरोगी राहते, शिवाय त्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. म्हणून तुम्ही लिंबू पाणी किंवा गुलकंदाचे सरबत किंवा कोकम ज्यूस यांसारख्या पेयांमध्ये सब्जाच्या बिया टाकून पिऊ शकता.
३) विड्याची पाने
विड्याची पाने आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. ती शरीरातील उष्णता दूर करण्यास, शरीराचे तापमान कमी करण्यास आणि शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. विड्याची पाने, पुदिना, बडीशेपचा वापर करून उन्हाळ्यात एक हेल्दी ड्रिंक बनवू शकता.
४) ताक
उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे ताक पिणे होय. दुपारी काळे मीठ, हिंग आणि जिरेपूड घालून बनवलेले पातळ ताक प्यायल्याने तुम्हाला ताजेतवाने आणि सुखदायक वाटते. विशेषतः दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायल्याने आम्लपित्त आणि पोटात जळजळ होण्यापासून आराम मिळतो.
५) नारळाचे पाणी
उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासह उष्माघातापासून बचाव करणारे उपयुक्त पेय म्हणजे नारळाचे पाणी. जे शरीरास आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स पुरवते.
६) काकडी
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या जाणवत नाही. यामुळे उन्हाळ्यात काकडीचा ज्यूस किंवा काकडीपासून बनवलेले विविध पदार्थ खाणे शरीरास फायदेशीर असते.
७) बडीशेप
बडीशेप ही चवीला थंड असल्याने ती खाल्ल्यानंतरही शरीरात एक थंडपणा जाणवतो. बडीशेप शरीराला थंड ठेवण्यास आणि उष्णतेपासून आराम देण्यास मदत करते. पोटात उष्णता जाणवत असल्यास तुम्ही बडीशेपचे सेवन करू शकता. विविथ पेयांमध्ये तुम्ही बडीशेप टाकून पिऊ शकता.
८) द्राक्ष
उन्हाळ्यात द्राक्षे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. हे फळ अँटी-ऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. द्राक्षे त्वचेला सूर्यप्रकाशापासून होणाऱ्या हानीपासून वाचवतात.
९) पेरू
पेरू खाण्यासाठी जितका स्वादिष्ट असतो तितका तो आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त असते.
१०) गुलकंद
गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला गुलकंद उन्हाळ्यात सर्रास खाल्ला जातो. गुलकंदापासून बनवलेल्या सरबतामुळे शरीराला एक थंडपणा मिळतो. बहुतेकदा उन्हामुळे जाणवणाऱ्या आरोग्यासंबंधित समस्या दूर करण्यासाठी गुलकंदाचा वापर केला जातो.
११) ताडगोळा
उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ अनेक जण आवर्जून खातात. या रसाळ फळाच्या सेवनामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट आणि द्रव यांचे संतुलन राखण्यास मदत होते. शिवाय डिहायड्रेशनची समस्या टाळता येते. उन्हाळ्याच्या महिन्यांत ताडगोळ्याच्या सेवनाने शरीराचे तापमान योग्य राखण्यास मदत होते.
१२) कोकम
कोकम सरबत हे उन्हाळ्यातील प्रसिद्ध पेयांपैकी एक आहे. कोकम फळ एक नैसर्गिक शीतक आहे आणि एक ग्लास कोकम ज्यूसमुळे आपल्याला उन्हाळ्यातील उष्णतेपासून खूप आराम मिळतो. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत जे उन्हाळ्यात अनेक आजारांपासून संरक्षण करतात.
१३) लिची
लिची एक आवडते उन्हाळी फळ आहे जे गोड, रसाळ तर आहेच शिवाय यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी यांसारखी अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे आहे, जे सर्व विविध प्रकारचे आरोग्यदायी फायदे देतात.
१४) लिंबू
लिंबू हा व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत मानला जातो. लिंबाचा वापर उन्हाळ्यातील अनेक पेये बनवण्यासाठी केला जातो. यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात ओलावा टिकून राहतो. तसेच शरीरास आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. लिंबाच्या पाण्यात संत्र्याची साल किंवा पुदिन्याची पाने टाकून तुम्ही एक रिफ्रेशिंग ड्रिंक बनवू शकता.
१५) आंबा
आंबा हे फळ अनेक पोषक तत्त्वांचे पॉवरहाऊस आहे जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, उष्माघात टाळण्यास मदत करते.
१६) पुदिन्याची पाने
काकडीचे तुकडे किंवा ऑरेंज ज्यूस यात पुदिन्याची पाने टाकून तुम्ही एक एनर्जी ड्रिंक बनवू शकता. उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी हे पेय उपयुक्त ठरते.
१७) संत्री
संत्री हे पोटॅशियमने समृद्ध फळ आहे, घामामुळे आपल्या शरीरातील अनेक पोषक तत्त्वे कमी होतात. मात्र संत्र्यांच्या सेवनामुळे ही पोषक तत्त्वे पुन्हा मिळतात.
१८) अननस
अननस हे व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम यांसारख्या पोषक तत्त्वांचे पॉवरहाऊस आहे. उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी हे एक उत्तम फळ मानले जाते.
१९) स्टार फ्रूट
हे आंबट फळ बहुतेकांना आवडते, विशेषत: थोडे मीठ घालून खाल्ले तर हे फळ चवीला अधिकच उत्तम लागते. हे रसदार, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सने भरलेले फळ शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.
२०) टरबूज
या फळात जवळपास ९० टक्के पाणी असते, जे शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते.
उन्हाळ्याच्या महिन्यांत तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा वापर मर्यादित केल्यास शरीराचे तापमान कमी राहण्यास मदत होईल. त्याऐवजी तुम्ही उन्हाळ्यात उपलब्ध फळांचे सेवन करून शरीराचे तापमान नियंत्रित करू शकता आणि आरोग्य निरोगी ठेवू शकता.