Breaking News

ताडोबातील वाघांच्या अभयारण्यावर हत्तीचे अतिक्रमण

ओरिसातून स्थलांतरित होणाऱ्या रानटी हत्तींनी महाराष्ट्रातील वन खात्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. याआधी साधारणत: चार वर्षांपूर्वी आलेला रानटी हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यात स्थिरावला असतानाच आता वाघांच्या प्रदेशात पुन्हा नवीन हत्ती दाखल झाले आहेत.

 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या खूप वाढली आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेरही वाघांची संख्या वाढल्याने मानव-वाघ संघर्ष मोठा होत चालला आहे. हा संघर्ष हाताळणे खात्याला कठीण होत असतानाच आता हत्तींनी नवे आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रातच गेल्या तीन दिवसांपासून हत्ती फिरत आहेत. व्याघ्रप्रकल्पाची चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून असली तरीही मानव-वाघ संघर्षासारखी परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. २०२१ मध्ये २२-२३ हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात आला आणि येथेच स्थिरावला. तत्पूर्वी २०२० मध्येही काही हत्ती जिल्ह्याच्या सीमेवर येऊन गेले. दरम्यानच्या काळात संघर्षाच्या घटना घडल्या. भंडारा जिल्ह्यातही हत्तींचा कळप दाखल झाला. आता दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दोन रानटी हत्ती दाखल झाले. त्यामुळे रानटी हत्तींच्या संवर्धनाचे मोठे आव्हान ताडोबा प्रशासन तसेच वनखात्यासमोर आहे. मध्य प्रदेशातही काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रासारखीच स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मध्य प्रदेश सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हत्ती व्यवस्थापनासाठी चार वर्षांकरिता ४७ कोटी ११ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातही अशी तरतूद गरजेची मानली जात आहे.

 

खाणप्रकल्पांमुळे हत्तींचा अधिवास हिरावला

ओडिशातील हत्तींच्या अधिवासात मोठ्या प्रमाणावर खाणप्रकल्पांना मंजुरी देण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे हत्तींचा हक्काचा अधिवास हिरावत आहे. त्यामुळे हे हत्ती छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रात दाखल होत असल्याची माहिती आहे.

 

मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ‘हाथी मित्र दल’

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांत बाहेरून आलेल्या रानटी हत्तीमुळे होणारा संघर्ष टाळण्यासाठी ‘हाथी मित्र दल’ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी दोन्ही राज्यांच्या वनखात्याने भ्रमणध्वनी अॅप तयार केला आहे. या अॅपच्या माध्यमातून हत्ती मित्र हत्तीच्या कळपाचे ठिकाण शोधतात. हे अॅप स्वत:च २० किलोमीटर परिसरातील गावांची ओळख करून त्या गावातील लोकांना भ्रमणध्वनीवर इशारा पाठवतो. यामुळे त्याठिकाणी संघर्ष आटोक्यात आहे.

 

महाराष्ट्रात हत्तीचा संघर्ष टाळायचा असेल तर मध्य प्रदेश, छत्तीसगडप्रमाणेच योजना आखावी लागेल. गेल्या चार-पाच वर्षांत ओडिशातून येणाऱ्या हत्तीचा ओघ पाहता यापुढेही हत्ती येतच राहतील. हत्ती पळवून लावणे हा काही पर्याय नाही. यातून मानव-हत्ती संघर्ष वाढण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिकांच्या सहकार्याने ‘हत्ती मित्र दल’ व अभ्यासगट तयार करून हत्तींचा मागोवा घेत त्यांच्या नोंदी ठेवल्या तर यापुढे येणाऱ्या हत्तींच्या संवर्धनासाठी त्यांचा उपयोग होईल.

 

उमेश धोटेकर, सेवानिवृत्त वनाधिकारी

About विश्व भारत

Check Also

राज्यभरात पावसाचा इशारा : सोमवारनंतर जोर वाढणार

राज्यात अनेक भागात पावसाची हजेरी लगण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण …

भालू की मौत मामले में वन विभाग के तीन कर्मचारी सस्पेंड

भालू की मौत मामले में वन विभाग के तीन कर्मचारी सस्पेंड   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *