अडीच कोटींवर ‘लाडक्या बहिणीं’ची ईकेवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. पाच हजार सरकारी कर्मचारी, तीन हजार शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही या योजनेचा गैरफायदा घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी करण्यात येत आहे. पुढील महिनाभरात हे कर्मचारी कोणकोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होणार असून त्या त्या विभागांना यासंदर्भातील पत्र पाठविण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच आहेत, शिवाय त्यांची पगारवाढही रोखली जाण्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे. याविषयीचे पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे.
अधिक उत्पन्न असतानाही योजनेचा लाभ
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असली तरी अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही निवडणूक काळातील गडबडीचा लाभ घेत या योजनेचे रक्कम लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा सुमारे पाच लाख महिला लाभार्थींनी कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही लाडकी बहीणचे पैसे लाटले आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
१ काेटी ३० लाख महिलांचे ईकेवायसी
अडीच कोटी महिलांपैकी आतापर्यंत १ कोटी ३० लाख महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. अद्यापही १ कोटीवर महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. त्यांच्यासाठी ३१ डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे. एवढ्या वेळेत ईकेवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र त्याही वेळेत ईकेवायसी पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे पती किंवा वडील दोघेही हयात नाहीत, त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र अंगणवाडी सेविका कार्यालयात दिल्यास त्यांनाही आपले ईकेवायसी पूर्ण करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
६५ वर्षांवरील दीड लाख महिला बाद
वयाच्या २१ वर्षांवरील आणि ६५ वर्षांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येतो. त्यानुसार वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिलांना या योजनेतून वगळले जात आहे. दर महिन्याला अशा १० ते १२ हजार महिला या याजनेतून बाद होत असून वर्षभरात दीड लाखांवर महिला या याेजनेतून बाद झाल्या आहेत. यासाठी सॉफ्टवेअरमध्ये तशी रचनाच करण्यात आली असून आपोआप वयाची पूर्तता झाल्यानंतर महिला यातून वगळल्या जात आहेत.
विश्वभारत News Website