राज्यातील दगडखाणीत सुरु असलेले अवैध उत्खन्न थांबवावे लागेल. गौण खानिज क्षेत्रात सुरु असलेल्या उत्खन्नाचा तीन महिन्यात ईटीएसद्वारे (इलेक्ट्राॅनिक ट्रान्झिट सिस्टीम) मागील पाच वर्षाचे सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणानंतर अवैध उत्खन्न करणाऱ्यांवर दंड तसेच फैाजदारी गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी एक विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
भिवंडी येथील पिळंझे खुर्द गावाजवळ जेएमडी इंटरप्राईजेस या कंपनीने हजारो ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खन्न केले. या कंपनीला दहा कोटी रुपयांचा स्वामीत्व धन आणि दंड वसुलीचा आदेश देण्यात आला आहे. अशा प्रकारे या तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खन्न मोठया प्रमाणात केले जात आहे. या अवैध उत्खन्नाने राज्य सरकारच्या महसूलाचे कोटयावधी रुपयांचे नुकसान होत आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्हयात असे अनेक अवैध दगडखाणी व स्टोन क्रशर आहेत. अशी लक्षवेधी सुनिल प्रभू यांनी मांडली. दिलीप लांडे, राजू खरे, नाना पटोले, संजय मेश्राम या आमदारांनी या लक्षवेधीवर उपप्रश्न विचारले.
ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर येथील गौण खनिज क्षेत्रातील दगडखाणी व स्टोन क्रशर परवानगीपेक्षा जास्त पोखरत असल्याची वस्तुस्थिती आहे. दगडखाणी, स्टोन क्रशर यांच्यासाठी जमिन मालक, प्रदुषण नियंत्रण मंडळ, स्फोटके वापर अशा अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. ईटीएस तंत्रज्ञानाने वैध दगडखाणींनी किती उत्खन्न केले आहे, ते कळणार आहे.
अवैध दगडखाणी ह्या कोणाच्या तरी अर्शिवादाने चालतात. सरकारची ही लूट थांबली पाहिजे. त्यांचे या तंत्रज्ञानाने मागील पाच वर्षातील उत्खन्न मोजले जाणार आहे. त्यासाठी सनदी अधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष चौकशी पथक नेमले जाईल.अवैध दगडखाणी, स्टोन क्रशर मालकांकडून पाच वर्षाचा दंड वसूल केला जाईल. ईटीएसचा हा अहवाल येत्या तीन महिन्यात तयार केला जाणार आहे. या अहवालाची श्वेतपत्रिका काढली जाईल. पुढील अधिवेशनात हा अहवाल सभागृहासमोर ठेवण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
विश्वभारत News Website