विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील बऱ्याच भागात वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर होत असते. लिलाव बंद असताना नियमबाह्य वाळूची चोरी होत आहे.
हा प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे सुतोवाच मंत्री विखे-पाटील यांनी केले. ज्या भागातून वाळू चोरी केली जाते,त्या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सध्या राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातले आहे. यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे.
वाळूचोरीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. त्यामुळे राज्यात सर्वच जिल्ह्यांत होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी लवकरच राज्य सरकार वाळूविषयी नवे धोरण राबवणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या वेळी पंढरपूर येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.