“मुलांसाठी आई-वडिलांचे आशीर्वाद आयुष्याला समृद्ध करतात. आयुष्याची माती करायची नसेल तर आई-वडिलांना सांभाळा,”असे भावनिक आवाहन नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या विश्वस्त कीर्तनकार कांचनताई जगताप यांनी केले.
या वेळी विजय औताडे यांनी त्यांच्या आई कै.अनिताताई साईनाथ औताडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भगवानबाबा बालिकाश्रमातील २० मुलींना दत्तक घेतले. हर्सूलचे ग्रामदैवत हरसिद्धी माता यात्रोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात जगताप बोलत होत्या.
“जन्माला येणे आपल्या हातात नाही. या जगातून जाणेही आपल्या हातात नाही. ज्ञानाने, प्रपंचाने माणसाने श्रीमंत असावे. रावणाकडे सर्व प्रकारचे ज्ञान होते. त्यामुळे तो सर्व बाजूंनी श्रीमंत होता. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. भावा-बहिणीशी बोला. जोपर्यंत आपल्या आयुष्यातील द्वेष दूर जात नाही, तोपर्यंत आपल्याला परमार्थ मिळत नाही,”असेही त्यांनी आपल्या जाहीर कीर्तनातून सांगितले.