✍️मोहन कारेमोरे
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि शिंदे गटात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. त्यात भाजप आहेच. शिवसेनेला डिवचण्याचे काम भाजप पद्धतशीरपणे करीत आहे. तसेच सेनेला ‘अंडरएस्टीमेट’करून आपणच कसे योग्य आहोत, हे दाखविण्याचा खटाटोप भाजप करतेय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सेनेचीही भाजपवर आगपाखड
यापूर्वी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राला मोडून, कमजोर करून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल?, असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. परंतु, त्याचवेळी शिवसेनेने मुंबई पुन्हा जिंकण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.
कोणी कितीही अपशकून करु द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून मुंबई पुन्हा जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला हे कळणार देखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता आणि तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्प पळवणे हे कसले लक्षण?
महाराष्ट्राची अखंडता, मुंबईची महाराष्ट्राशी असलेली नाळ तोडायची असेल तर आधी शिवसेनेची वज्रमूठ तोडावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातून मुंबईचा लचका तोडता येणार नाही हे माहीत असल्यानेच एका ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रातील घटना वेगाने घडत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. महाराष्ट्रातील उद्योग खेचून-पळवून गुजरातेत नेले जात आहेत. एक ‘वेदांता’च नाही, तर ‘ड्रग्ज पार्क’पासून अनेक प्रकल्प उद्योगपतींना फूस लावून, आमिषे दाखवून न्यायचे हे कसले लक्षण मानावे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
(टीप : बुरा न मानो… होली है…!)