भारतीय आयटी (IT) सेवा कंपनी इन्फोसिस (Infosys) या वर्षी फ्रेशर्सची भरती करण्यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये जाणार नाही. कारण अमेरिकेसारख्या प्रमुख बाजारपेठेतील मागणी कमी होत आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.
गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत इन्फोसिसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी म्हटले आहे की कंपनीला कर्मचारी अकार्यक्षमतेचा सामना करावा लागत आहे.
जनरल AI बाबत प्रशिक्षित होत असलेल्या महत्त्वाच्या फ्रेशर बेंचकडे कंपनीने लक्ष वेधले आहे. यावर इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय म्हटले आहे की कंपनीचा सध्या नवीन कॅम्पस भरती करण्याचा विचार नाही.
“आमची यावर्षी फ्रेशर्स भरतीसाठी कॅम्पसमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. पण प्रत्येक तिमाहीत परिस्थिती पाहावी लागेल,” असेही ते पुढे म्हणाले.
आयटी सेवा उद्योग दरवर्षी भारतातील १५ लाख अभियांत्रिकी पदवीधरांपैकी २०-२५ टक्के पदवीधरांना सामावून घेतो. पण अमेरिकेतील मंदीच्या भीतीमुळे आयटी कंपन्या फ्रेशर्सची भरती कमी करण्याची योजना आखत आहेत.
२०२१ ते सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ पर्यंत टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys), विप्रो (Wipro), एचसीएल (HCL), टेक महिंद्रा (Tech Mahindra), Cognizant, Accenture आणि इतर अनेक IT कंपन्यांनी गेल्या दोन आर्थिक वर्षांत ८ लाख फ्रेशर्सची भरती केली होती.
२०२२ आणि २०२३ च्या बॅचमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील हजारो फ्रेशर्स ज्यांनी IT सेवा कंपन्यांमध्ये ऑन किंवा ऑफ कॅम्पसमध्ये नोकऱ्या मिळवल्या आहेत, त्यांना अनबोर्डिंग विलंबांचा सामना करावा लागत आहे.
Infosys ने १२ ऑक्टोबर रोजी या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील त्यांची कमाई जाहीर केली. कंपनीचा निव्वळ नफा ३.१७ टक्क्यांनी वाढून ६,२१२ कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ६,०१२ कोटी होता. बंगळूर स्थित या कंपनीने संपूर्ण वर्षासाठी महसूल वाढीचे लक्ष्य १-२.५ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.