अवकाळी पाऊस, गारपिटीचा नागपूरसह अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना फटका बसला आहे. राज्यात हजारो हेक्टरवरील पिके, फळबागा मातीमोल झाल्या आहेत. 16 जिल्ह्यांत नुकसानीचे मोठे आकडे समोर येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. आज मंगळवार सकाळपासून नागपुरात पावसाला सुरुवात झाली.
काही भागांत झालेल्या गारपिटीने फळबागांचेही नुकसान झाले आहे. राज्यात सध्या खरीप हंगामातील भातपिकाची काढणी सुरू आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये प्रामुख्याने काढणीच्या अवस्थेतील भातपिकास फटका बसला आहे.
खरीप ज्वारीच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. याबरोबरच कांदा, कापूस या पिकांनाही फटका बसला आहे. गारपिटीमुळे द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळी, मोसंबी, लिंबू आदी फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.