पावसाळ्यातील धोके ओळखून आराखडा तयार करण्याच्या सूचना
मान्सूनपूर्व आढावा बैठक
वर्धा, दि 17मे (जिमाका):- यावर्षी पावसाळ्यातील आपत्तीसोबतच आपल्याला कोरोना संसर्गाच्या आपत्तीचे सुद्धा नियोजन करायचे करावे. सर्व यंत्रणांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी, जीर्ण झालेल्या इमारती, अर्धवट बांधकाम झालेले रस्ते, वाढलेली झाडे, धरणाच्या पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी पर्यायी व्यवस्थे सोबतच अशा गावांसाठी तीन महिन्याचे आगाऊ रेशनची व्यवस्था याबतचा आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्यात.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांनी दुरदृश्य प्रणाली द्वारे मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली, यावेळी त्यांनी सदर सूचना केल्यात. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार , गट विकास अधिकारी, आणि इतर विभाग प्रमुख दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी पुराचा वेढा बसणाऱ्या आणि पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांवर लक्ष देण्यास सांगितले. नदीकाठच्या गावांमध्ये पावसाळ्यापूर्वीच तीन महिन्याचे रेषनचे धान्य पोहचविण्याची सूचना त्यांनी दिली. अशा गावांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर धरणाच्या विसर्गाची आगाऊ माहीती देण्यात यावी यामुळे संबंधित गावांना पुरासंबंधी माहिती देऊन त्यांना आधीच स्थलांतरीत करता येणे सोपे होईल.
तसेच अर्धवट काम झालेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यापूर्वी रस्ते पूर्ण होत नसल्यास त्या ठिकाणी आवश्यक त्या सूचना लावण्यात याव्यात.
जीर्ण झालेल्या इमारती आणि पूल यांचे सर्वेक्षण करून ते राहण्यासाठी आणि वाहतुकीसाठी बंद करावे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ कार्यवाही करावी. विद्युत वितरण विभागाने रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोना संसर्गाचे रुग्ण रुग्णालयात भरती असल्यामुळे याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, खंडित वीज पुरवठ्यामुळे रुग्णांच्या जीवितास बाधा होणार नाही यासाठी आता पासूनच तयारी करावी अशा सूचना दिल्यात.
तालुकास्तरीय आणि गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची तात्काळ बैठक घेऊन गावनिहाय आराखडा सादर करण्याचा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरू राहील याची खबरदारी घ्यावी. सर्व संबंधित यंत्रणा यांनी त्यांच्या कार्यालयात सुद्धा नियंत्रण कक्ष सुरू करण्यास सांगीतले.