राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुरजागड येथील लोहखाणींना नक्षलवाद्यांचा विरोध आहे. या खाणींसाठी मंत्री धर्मरावबाबा आश्रम व त्यांचे जावई हेच जबाबदार आहेत, असा आरोप करत दोघांनाही जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. एटापल्ली तहसीलच्या गट्टा परिसरात नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून ही धमकी दिली आहे. वर्षभरात आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून आलेली ही तिसरी धमकी आहे.
मागील दोन वर्षांपासून उत्खनन सुरू
मागील दोन वर्षांपासून सुरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षलवाद्यांनी विरोध केला आहे. खाणींचे उत्खनन होण्यास धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ आणि कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत.
आत्राम यांना झेड प्लस सुरक्षा
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथे सुरू असलेल्या लोखंडाच्या खाणीतील खनिज उत्खननाबाबत नक्षलवाद्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना हिवाळी अधिवेशनादरम्यान आणि त्यानंतरही धमकी दिली होती. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, धर्मराव बाबा आत्राम यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार आत्राम यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान, धमकी आल्यानंतर गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे की, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आम्ही घेत आहो. त्यांना सद्यस्थितीत ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. नक्षल्यांच्या धमकीपत्राबाबत आम्ही तपास सुरू केला आहे. तर, धमकीवर प्रतिक्रीया देताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात आता कुठे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. सूरजागड प्रकल्पामुळे हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे अशा धमक्यांकडे मी लक्ष देत नाही.