राज्यात गेल्या १९ दिवसांत आठ वाघांचा मृत्यू झाला. हे सर्वच मृत्यू संशयास्पद आहेत, पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात आले नाही. त्यामुळे वन खाते खरोखरच वाघांच्या संरक्षण व संवर्धनाविषयी गंभीर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही-आलेवाहीजवळ धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाला.
चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेमार्गावर आजवर ५० पेक्षा अधिक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत झालेले वाघांचे मृत्यू भविष्यात वाघांना असणारा धोका दर्शवणारे आहे. वाघांचे तीन तुकडे करून जंगलात फेकल्यानंतरही वनाधिकाऱ्यांना माहिती होत नाही. शिकारी वाघाची शिकार करून १२ नखे आणि दात काढून नेतात, पण त्याची साधी कुणकुणही त्यांना लागत नाही. वाघिणीचे बछडे उपासमारीने मरतात, त्यांची आई अजून सापडलेली नाही. वाघ नाल्याजवळ मृतावस्थेत पडलेला असूनही ते माहिती होत नाही. यातील दोन घटना स्पष्टपणे शिकारीकडे बोट दाखवणाऱ्या आहेत. या शिकारी स्थानिकांना हाताशी घेऊन बहेलिया शिकारी टोळ्यांनी घडवून आणल्या असतील तर संपूर्ण राज्यासाठी ती धोक्याची घंटा आहे.
वाघांचे मृत्यू
१) २ जानेवारी २०२५ – ब्रह्मपुरी वन विभागात सिंदेवाहीजवळील लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला.
२) ६ जानेवारी २०२५ – भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात पाचरा येथे वाघाचे तीन तुकडे करून फेकण्यात आले.
३) ७ जानेवारी २०२५ – यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागाअंतर्गत उकणी कोळसा खाण परिसरात वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
४) ८ जानेवारी २०२५ – नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला.
५) ९ जानेवारी २०२५ – ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मूल बफर क्षेत्रात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला.
६) १४ जानेवारी २०२५ गोंदिया वनपरिक्षेत्रामधील कोहका-भानपूर परिसरात वाघाचा मृतदेह आढळला.
७) १५ जानेवारी २०२५ – नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात नवेगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ४८७ मध्ये वाघाच्या बछड्याचा कुजलेला मृतदेह आढळला.
८) १९ जानेवारी २०२५ – बल्लारशा – गोंदिया रेल्वेमार्गावर सिंदेवाही-आलेवाहीजवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला.
वर्ष
२०२० – १०६
२०२१ – १२७
२०२२ – १२१
२०२३ – १७८
२०२४ – ९९
१ ते १९ जानेवारी २०२५ – ०८
व्यवस्थापन गरजेचे
●वाघांचा माणसाशी होणारा संघर्ष टाळायचा असेल तर, आधी वाघ बाहेर पडू नये यासाठी वाघांचे खाद्या असणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांच्या व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले होते.
●हे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाले तर वाघ बाहेर पडणार नाही.
●यात माणसांचा जीव जाणार नाही व वाघदेखील मृत्युमुखी पडणार नाही.
●वनमंत्री गणेश नाईक यांनी अलीकडेच यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती.
विश्वभारत News Website