नागपूर: कोरोना नियंत्रित ठेवण्यात यशस्वी ठरले असले तरीही लॉकडाऊनच्या काळात झालेल्या चुका टाळून प्रशासकीय यंत्रणेने योग्य समन्वय ठेवावा. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येईल. त्यातून जनतेचा यंत्रणेवरील विश्वास वाढेल, त्यांमुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास जनतेचे सहकार्य लाभेल. सुरुवातीला नियंत्रणात राहिलेला कोरोना नंतरच्या काळात झपाट्याने वाढत असून पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केल्या. जिल्ह्यात कोरोनाबाधित सापडल्यानंतर तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंधित क्षेत्राचे स्वरुप लघु आणि मर्यादित ठेवावे. त्यामुळे इतर नागरिकांची गैरसोय टाळता येईल, असेही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.
लॉकडाऊन उठवल्यानंतर महानगरांमधून ग्रामीण भागात कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार झाला. तो रोखण्यासाठी यंत्रणेने लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करताना, शेतकरी वर्ग अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्यावी. सध्या शेतीशी निगडीत कामासाठी, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शहरात यावे लागत आहे. त्यावेळी पोलिस व प्रशासकीय यंत्रणेने त्यांची अडवणूक करू नये, अशा सूचना खासदार कृपाल तुमाने यांनी बैठकीत केल्या. प्रतिबंधित क्षेत्रात कार्यवाही करताना महापालिका अधिकारी आणि पोलिस यंत्रणेने समन्वय साधून काम करावे. त्यासाठी त्यांनी समन्वय बैठका घ्याव्यात, अशा सूचना आमदार विकास ठाकरे यांनी केल्या. विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी जिल्ह्यात कोरोना काळात, कोरोना नियंत्रणासाठी पोलिस, प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहींची मंत्रिद्वयींना माहिती दिली. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी माहिती दिली.
प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवावा : डॉ. नितीन राऊत
Advertisements
Advertisements
Advertisements