देशावर लादलेल्या आणीबाणीचा तीव्र निषेध : आ. मुनगंटीवार
चंद्रपूर,
25 जून 1975 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली व सर्व प्रसारमाध्यांचे स्वातंत्र्य हिरावले. याचवेळी अनेक निष्पाप व्यक्तींना तुरूंगात डांबण्यात आले. यातील कित्येकांनी 19 महिन्यापर्यंत तुरूंगवास भोगला व त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना प्रचंड त्रास झाला. अशा आणीबाणी दिनाचा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
यावेळी चंद्रपुरातीलही अनेकांना तुरूंगवास भोगावा लागला. त्यातीलच एक हनुमाननगर येथील रहिवासी सुधीर टिकेकर यांनासुध्दा दोन महिने तुरूंगवास भोगावा लागला. त्यांच्या या त्यागाची आठवण म्हणून आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्या घरी जावून शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी सुधीर टिकेकर यांनी या छोट्याश्या त्यागाची आठवण ठेवून सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
चंद्रपुरातील आणखी काही जणांनी त्या काळात कारावास भोगला. त्या सगळ्यांच्या घरी जावून जिल्हा व महानगरातील पदाधिकार्यांनी त्यांचा सत्कार केला. यामध्ये नंदू वेखंडे, बंडू पदलमवार, गिरीश अणे, अनिल अंदनकर, हेमंत डहाके, नानुजी पिंपळापूरे यांचा समावेश आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, रवी आसवानी, संदीप आवारी, माजी महापौर अंजली घोटेकर, अनिल फुलझेले, विशाल निंबाळकर, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.
शुक्रवारी झालेल्या संवाद सेतुमध्ये आ. मुनगंटीवार यांनी आणीबाणी कशी व का लावली याची कार्यकर्त्यांना माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.