राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरच्या संविधान चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा बारावा दिवस आहे. रविवारपर्यंत चर्चेला न बोलावल्यास साेमवारपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यातील सर्व ओबीसी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरणे गरजेचे आहे. कारण त्यांना मिळणारी जास्त मते ओबीसीचीच असतात असे तायवाडे यांनी सांगितले. तत्पूर्वी महिला विधेयकात ओबीसी महिलांना न्याय मिळाला नाही म्हणून सरकारचा निषेध केला. त्यानंतर सरकारला चर्चेसाठी बोलावण्याकरिता रविवारपर्यंतची मुदत देण्यात आली. दरम्यान, नागपूर कामठी परदेशी धोबी समाजाचे नरेश बैस्वारे, कुणबी सेवा संघाचे पंकज पांडे, कुणबी महासंघाचे अध्यक्ष राजू भोतमांगे, कार्याध्यक्ष राजू खडसे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
टोंगेंची प्रकृती चिंताजनक
मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्याच्या विरोधात चंद्रपुरात गेल्या ११ दिवसांपासून चंद्रपूरमध्ये उपोषणास बसलेले रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. मात्र, सरकारकडे त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपुरात भीख मांगो
ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी “भीक द्या भीक द्या… सरकारला भीक द्या…’ अशा घोषणा देत चंद्रपुरात भीख मांगो आंदोलन करण्यात आले. शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करू, असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांनी या वेळी दिला.