पाणी टंचाई विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन
– मुबलक पाणी देण्याची मागणी
चंद्रपूर,
दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे, या मागणीकरिता सोमवार, 31 मे रोजी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करीत मनपासमोर निदर्शने करण्यात आली.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामूळे दरवर्षीच्या उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाच्या उन्हाळ्यातही हिच परिस्थिती उद्भवली असून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये मनपाप्रती रोष आहे. काही भागात महानगर पालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणी पूरवठा करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. मात्र, हे टँकर येताच नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
अशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचीही शक्यता निर्माण होत आहे. संपूर्ण शहरासह बाबूपेठ, भिवापूर, रहैमतनगर, बगड खिडकी, इंडस्ट्रीयल वॉर्ड, वडगाव वॉर्ड या भागात पाण्याची अधिक टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पाणी पूरवठा सुरळीत करुन नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी द्या, अशी मागणी करीत जोरदार निदर्शने करण्यात आली व पाणी पूरवठाबाबत मनपाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
यावेळी एका शिष्टमंडळाने उपायुक्त विशाल वाघ यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली असून, पाणी पूरवठा नियमित सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, जितेश कुळमेथे, विश्वजित शहा, अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर प्रमूख सलीम शेख, राशीद हुसैन, नितीन साहा आदींची उपस्थिती होती.