राज्याचा आरोग्य खात्याचा कारभार हाती घेऊन नऊ महिने झाले. मात्र,आरोग्य खात्याचे अधिकारी माझे ऐकत नाहीत, मी सांगून थकलो आहे, अशी कबुली खुद्द आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
अधिकारी जागचे हलत नाहीत. ते लालफितीच्या कारभारात अडकले आहेत. आता मी सगळीकडे जाणार का, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मनोवृत्तीपासून ते सेवासुविधांपर्यंत सर्वच पातळ्यांवर काम करण्याची आवश्यकता आहे. एखादा शंभर कोटी रुपयांचा प्रकल्पाला दिरंगाई झाल्यास तो पाचशे कोटी रुपयांपर्यंत जातो आणि सरकार त्या ठेकेदाराला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैसे वाढवून देते. माता सुरक्षित, जागरूक पालक-सुदृढ बालक किंवा नंदुरबार आदिवासी पट्ट्यातील कुपोषण कमी व्हावे म्हणून आखून दिलेला ४४ कलमी कार्यक्रम, या सर्वच योजना आखून दिल्यानंतरही आरोग्य विभागातील अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. मी आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार (एसओपी) अंमलबजावणी झाल्यास कुपोषणाचा मृत्यूदर शून्य टक्क्यांवर येऊ शकेल. आरोग्य खाते हे सर्वात मोठे खाते असून अडचणीही तेवढ्याच आहेत.
विश्वभारत News Website