तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अनेक नवे प्रकार समोर येत आहेत. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीतील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती गुणवत्ता यादीमध्ये पहिला आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.
तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात अनेक उमेदवारांना एकूण २०० गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ‘नॉर्मलायझेशन’नंतर गुणवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, तलाठी भरती प्रक्रियेत पेपर फुटीच्या घटना घडल्याचे उघड झाले होते. त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्पर्धा परीक्षेशी कोणताही संबंध नसलेला एक टॅक्सीचालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे २०८ आणि १९८ गुण कसे मिळाले, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे. ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून ते टीसीएसमधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ‘एक्स’वरील संदेशाद्वारे केला आहे.तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला १९८ आणि बहिणीच्या पतीला २०८ गुण मिळाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.