शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यापासून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. भुजबळांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याच्या तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाविरोधात भुजबळ यांनी दंड थोपटले आहेत. छगन भुजबळ यांनी शनिवारी (३ फेब्रुवारी) अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
छगन भुजबळ म्हणाले, सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले काही नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधक मला म्हणतायत की, सरकारचे निर्णय पटत नसतील तर राजीनामा द्या. सरकारमधील एक आमदार म्हणाले, छगन भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळाबाहेर काढा. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचं आहे की मी १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आहे. आंबड येथे १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली पार पडली. त्या रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
भुजबळांच्या या गौप्यस्फोटावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. फडणवीस यांनी काही वेळापूर्वी गडचिरोली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील. आज मी एवढंच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. किंवा मुख्यमंत्र्यांनीदेखील भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.
३ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित गडचिरोली महोत्सवाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आले होते. रात्री ९.३० च्या सुमारास त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, याबाबत मुख्यमंत्री अधिक विस्ताराने सांगू शकतील, पण मुख्यमंत्र्यांनी किंवा मी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.
छगन भुजबळ काय म्हणाले?
ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले, मी १६ नोव्हेंबर रोजी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतरच आंबडच्या सभेसाठी रवाना झालो. त्यामुळे मला लाथा घालायची गरज नाही. मी आधीच राजीनामा दिलेला आहे. राजीनामा दिल्यानंतरही मी अडीच महिने शांत राहिलो. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मला म्हणाले की याची कुठेही वाच्यता करू नका.