वर्धा : आर्वी :- महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना आर्वी विभाग आणि तळेगाव विभाग यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देऊन कोरोना काळात जिव मुठीत घेऊन अत्यावश्यक सेवा बजावली असतांनाही एस. टी. कामगारांना वेतन मिळाले नाही याबाबत अवगत केले. यावर आमदार दादाराव केचे यांनी हा प्रश्न अधिवेशनात उचलून धरुन झोपी गेलेला सरकारला जागे करून एस. टी. कामगारांचा आवाज बुलंद करणार या बाबतीत आश्वस्त केले.
कोरोना आपत्ती काळात सोयी सुविधांचा अभाव असतांनाही एस. टी. कर्मचारी तसेच मुंबई बेस्टची प्रवासी वाहतूक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. सेवा देत असतांना बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झालेले असुन सुमारे ७४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. असे असतांनाही माहे अॉगस्ट २०२० पासून महामंडळाने कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले आहे. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस. टी. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सन. अग्रीम देण्याचे कामगार करारान्वये मान्य केले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९ पासून वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. परंतु एस. टी. कामगारांना सदरचा वाढीव ५ टक्के महागाई भत्ता अद्यापही लागू केलेला नाही. त्याचप्रमाणे सन २०१८ ची वाढीव २ टक्क्यांची तीन महीण्यांची थकबाकी व सन २०१९ ची नऊ महीण्यांची महागाई भत्त्याची थकबाकी ही एस. टी. कामगारांना अद्यापही मिळाली नाही. त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना रूपये १२५०० सण अग्रीम लागू केलेली आहे. परंतु एस. टी. कामगारांना ही अग्रीम लागू केलेली नाही.
यामुळे कामगारांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सणासुदीच्या दिवसात जिव मुठीत घेऊन समर्पित भावनेने एस. टी. कामगार कार्यरत असतांनाही त्यांना नियमानुसार देय असलेली देयक महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार देऊ शकत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे असे मत आमदार दादाराव केचे यांनी यावेळी व्यक्त केले.